लाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..!

महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच शरद पवार यांनी गाजवलेली २०१९ ची विधानसभा निवडणूक..

गेल्या ५० वर्षांपासून शरद पवार आणि राजकारण हे समीकरण माहीत नाही असा व्यक्ती विरळाच म्हणावा लागेल. राजकारणासोबतच अनेक क्षेत्रात लीलया वावर असणारे आणि सूक्ष्म अभ्यास असणारे पवार दिल्लीच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत. शेतकऱ्यांचा, कृषिविकासाचा विचार जपणारा नेता म्हणून शरद पवारांची ओळख. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेल्या शरद पवार यांनी पुरोगामी विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले राजकारण, समाजकारण, कृषी, औद्योगिक, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रात पवारांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

सुरवातीपासूनच लोकांमध्ये मिसळत जनमानसाची नाळ पवारांनी अचूक ओळखली होती त्याच जोरावर त्यांनी सार्वजनिक जीवनात कायम जनाधार कमावला, ग्रामीण भागासोबतच शहरीकरणाबाबत पवारांनी अनेक अनुकूल निर्णय घेतले त्यांच्या दूरदृष्टी मुळे व दूरगामी परिणामांचा विचार करून घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे शरद पवार आज दिल्लीत महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा म्हणून सर्वश्रुत आहेत.

राजकारणात नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करणाऱ्या शरद पवारांची कारकीर्द कधी आकर्षणाचा तर कधी वादाचा केंद्रबिंदू राहिली आहे त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. शरद पवार काहीही करू शकतात असा शब्द महाराष्ट्रात परवलीचा बनला आहे परंतु अलीकडच्या पिढीला याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना २०१९ मध्ये विधानसभेच्या निमित्ताने पाहायला मिळाल्या.

देशात एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपने महाराष्ट्रातही आपला चांगलाच जम बसवला होता पुन्हा भाजपच सत्तेत येईल या खात्रीने अनेकांनी राष्ट्रवादीला या ना त्या कारणाने सोडून आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला अनेक दिगग्जांनी पक्ष सोडल्याने शरद पवार या वयात वैफल्यग्रस्त होतील असा कयास बांधला गेला. ईडीच्या रडारवर पवारांना आणून नामोहरम करण्याचा डाव त्यांनी भाजपवरच उलटवला आणि आजपर्यंत भ्रष्टाचाराच्या दंतकथांवर ब्र न काढणाऱ्या पवारांनी ईडीला स्वतःहून भेटायला जाण्याचे सांगत आजपर्यंतच्या स्वतःवर झालेल्या असंख्य आरोपांना एका झटक्यात मातीत गाढले. “अभी तो मै जवान हूं ” सांगत प्रत्येक सभा गाजवून त्यांनी तरुणांना आपलेसे केले आणि या सर्वांवर कळस चढवला तो साताऱ्याच्या पावसातील त्या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक सभेने. हेही नसे थोडके म्हणून सत्ता स्थापनेवेळी घडीघडीला बदलणाऱ्या पेचप्रसंगांना अत्यंत सावध आणि संयमाने हाताळत “तेरे हर वार पें पलटवार हूं मैं युही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं” हे दाखवून दिले. या सर्वातून शेवटपर्यंत झुंज देण्याचा चिवट, खमक्या महाराष्ट्रबाणा पवारांनी जागवला आणि राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी पुन्हा सत्तेचा फासा अनाकलनीय पद्धतीने फिरवत ” टायगर अभी जिंदा है “हे दाखवून दिले. यातून राजकीय विचार बाजूला सारत याकडे निःपक्ष पाहिले तर चारही बाजूंनी संकटांनी घेरलेले असताना आलेल्या संकटाला पूर्ण ताकतीनिशी कसे आस्मान दाखवावे हे शरद पवारांनी दाखवून देत आपल्या लढाऊ वृत्तीचा व इच्छाशक्तीचा नवा अध्याय लिहिला.

सलग ५० वर्ष राजकारणात आपली लोकप्रियता टिकवणाऱ्या शरद पवार यांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित नेते न राहता विविध क्षेत्रात जे योगदान दिले आहे त्यामुळे महाराष्ट्राला खूप काही मिळाले आहे हे नाकारून चालणार नाही या बद्दल महाराष्ट्र नेहमीच त्यांचा ऋणी राहील हे नक्की.

साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

– श्री विनोद अशोक खटके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *