अजिंठा, वेरूळ लेण्या तब्बल ९ महिन्यांनी पर्यटकांसाठी खुल्या..!

| औरंगाबाद | कोरोनामुळे बंद असलेल्या अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या तब्बल नऊ महिन्यांनंतर पर्यटकांसाठी उघडण्यात येतील. ९ डिसेंबर रोजी पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येईल. येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांची काेराेना चाचणी झाल्यानंतर १० डिसेंबरपासून अजिंठा, वरूळ, दाैलताबादचा देवगिरी किल्ला तसेच शहरातील पाणचक्की, बीबी का मकबरा आणि राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेली सर्व पर्यटनस्थळे खुली होणार आहेत.

जिल्हा व शहरातील पर्यटनस्थळे सुरू करावीत यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक मिलन कुमार चावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करून नियमावली तयार करण्यात आली. त्यानंतर गुरुवारपासून पर्यटनस्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय आहेत नियम :

✓ www.mtdcresorts.in व www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. ऐनवेळी प्रवेश मिळणार नाही. ✓ अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांना सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटक भेट देवू शकतील.
✓ पानचक्की, बीबी का मकबरा, गौताळा अभयारण्यात देखील एक हजार पर्यटकांना परवानगी देण्यात येणार आहे.

आंदोलन, निवेदनानंतर पर्यटनस्थळे उघडण्याचा निर्णय :

ताजमहाल, मुंबईतील एलिफंटा लेण्या व इतर पर्यटनस्थळे उघडली तरी जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळच्या लेण्या उघडण्याची परवानगी स्थानिक प्रशासन देत नव्हते. यासाठी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनांनी केंद्र सरकार, राज्य सरकारशी पत्रव्यवहार केले. ऑनलाइन निषेधदेखील नोंदवला. स्थानिक प्रशासनाकडे निर्णय अडल्याचे कळताच ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली. पर्यटन व्यवसायावर जिल्ह्यातील हजारो लोकांचे व्यवसाय अवलंबून असल्याचे सांगितले. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *