आपले घर गळायला लागले म्हणून लगेच कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही – मनोज आखरे

| सोलापूर | आपले घर गळायला लागले म्हणून कुटुंबातील लगेच कोणी दुसऱ्या घरात जाण्याचा विचार करत नाही.त्या घराची डागडुजी करतात. पण जे लगेच दुसऱ्या घरात जातात ते कुटुंबातील कसे समजायचे ? असा प्रश्न उपस्थित करत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी पुरोगामी चळवळीचे नाव घेऊन निवडणूक लढविणाऱ्यांना टोला लगावला.

संभाजी ब्रिगेडने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलने केली पण रस्त्यावरच्या लढाईबरोबर विधीमंडळात पदवीधरांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी, प्रस्थापितांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधर निवडणूक लढवित असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. ते संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोज गायकवाड यांच्या प्रचारार्थ माढा तालुक्यातील टेंभुर्णीत आयोजित पदाधिकारी मेळाव्यात व पत्रकार परिषदेत बोलत होते. उक्ती आणि कृतीत अंतर ठेवून चालणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील अशीही टिका नाव न घेता मनोज आखरे यांनी इतर उमेदवारावर केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा सचिव सुहास टोणपे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, माढा तालुका अध्यक्ष बालाजी जगताप, करमाळा तालुका अध्यक्ष अमित घोगरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाची चळवळ संभाजी ब्रिगेडने उभी केली आहे. संभाजी ब्रिगेडची महापुरूषांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रूजविण्याची भुमिका आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम करूनही हे होताना दिसत नाही, राजकीय कास धरल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड राजकारणात सक्रिय झाली आहे. बेरोजागारांसाठी आजपर्यंत विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढत आलो असून, केजी टू पीजी शिक्षण हे सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी व शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न करण्यात आले. संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात सक्रिय झाली असून विधान भवनात समस्या सोडवण्यासाठी आपला माणूस पाहिजे या हेतूने या निवडणूका लढवत असल्याचे आखरे यांनी सांगितले.

समाजामध्ये संभाजी ब्रिगेडने गेली पंचवीस तीस वर्षे प्रबोधन, परिवर्तन केले आहे ते सर्व समाजातील तरूण तरूणी आमच्या बरोबर असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले. यावेळी माढा तालुका संघटक नितीन मुळे, टेंभुर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे, म.से.सं.कुर्डूवाडी अरूण जगताप, मसेसं करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे, तालुका संघटक गणेश शिंदे , कुर्डूवाडी शहराध्यक्ष धनराज पवार , शिवराज पवार, शंकर नागणे, प्रशांत कौलगे ,योगेश मुळे,गणेश डोके,निखिल मुळे, दिपक खोचरे, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते.

या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सोईस्करपणे वेगवेगळ्या व्यासपिठावर दिसत असल्याचे विचारले असता ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेडच्या विचारांचा वैचारिक कार्यकर्ता दुसऱ्या कोणत्याही व्यासपिठावर दिसणार नाही. ब्रिगेड या नावाने अनेक समांतर संघटना कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. उक्ती आणि कृतीत अंतर ठेवून चालणाऱ्यांना मतदार नाकारतात. तसेच शिक्षक मतदारसंघात कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *