ओबीसी-बहुजन विरोध म्हणजेच देशद्रोह!

देशात जेव्हा कागदोपत्री लोकशाही अस्तित्वात असते, तेव्हा नागरिक हे फक्त नागरिक असतात. कुणी कर्मचारी असतो, कुणी शेतकरी असतो, कुणी व्यापारी असतो, कुणी उद्योजक असतो, तर कुणी कामगार असतो. काही लोक राजकारणी असतात तर काही त्यांचे कार्यकर्ते असतात. अशावेळी देशभक्ती वगैरे सारख्या प्रकारात जनतेला फारसा इंटरेस्ट असल्याचे जाणवत नाही. ती आपल्या कामात व्यस्त असते.

मात्र त्याचवेळी धर्मांध, गुंड, लुटारू आणि देशद्रोही लोक अशा संधीचा फायदा घेत असतात. जेव्हा बहुसंख्य जनता बेसावध असते, तेव्हा देशद्रोही लोक वेगवेगळ्या सामाजिक मुखवट्यांचा सहारा घेतात. देशभक्तीचा, देशप्रेमाचा आव आणता येईल, अशी नावे आपल्या संस्था-संघटनांना देतात. भाषा गोड ठेवतात. सभ्यपणाचा आव आणतात. तथापि त्यांची सारी कारस्थानं बहुजन विरोधी असतात. देशविरोधी असतात.

जनता जसजशी जागी व्हायला लागते, तसतशी या लोकांची कारस्थानं देखील वाढत जातात. मग समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांची नियोजित पद्धतीनं निंदानालस्ती केली जाते. सर्वात आधी महिलांच्या संबंधाने महापुरुषांची बदनामी सुरू करतात. कुजबुज मोहीम तीव्र होते. या कामी यांच्या बायकाही दुर्दैवानं कारस्थानात सहभागी होतात. हे लोक स्वतः चारित्र्यहीन असतात. पण आव मात्र सतीसावित्रीचा आणतात. हे लोक कमालीचे निर्लज्ज असतात. कोगडेपणा हा यांचा विशेष गुणधर्म असतो. सारी कपट कारस्थानं दुसऱ्याच्या हातून घडवून आणण्यात हे पटाईत असतात. ज्यांच्या विरोधात कारस्थान करायचे त्यांच्यातलेच काही मूर्ख लोक अलगद यांच्या गळाला लागतात. त्यांच्याच हातानं हे शिकार करतात. शिकार मरो की शिकारी मरो, हे मात्र सुरक्षित राहतात. दोन्ही बाजूंनी यांचा फायदाच असतो.

देश हा माणसांनी बनतो. नदी, पहाड, जंगल किंवा जमिनीचा तुकडा म्हणजे देश नव्हे. समतेचा विचार हा देशप्रेमाची पहिली कसोटी आहे. जिथं समता नाही, तिथं देशप्रेम ही शुद्ध धूळफेक, नौटंकी आहे. आपल्या खंडप्राय देशाचा विचार केला, तर ओबीसी ५२ टक्के आहेत. ओबीसी-बहुजन मिळून ८५ टक्के समाज होतो ! तो खऱ्या अर्थानं या देशाचा मालक असायला हवा, पण आजही हाच समूह गुलाम आहे ! ८५ टक्के लोकावर अन्याय करून देशाचं हित कसं साधलं जाईल ? ही देशभक्तीची कोणती व्याख्या आहे ?

जात-पात, धर्म, पंथ, पक्ष कोणताही असो, जे जे ओबीसी-बहूजन हिताचे दुश्मन आहेत..ते समतेचे दुश्मन आहेत. आणि जे समतेचे दुश्मन आहेत.. ते सर्व देशद्रोही आहेत !

जो समतावादी असेल, तो देशभक्त !
जो मानवतावादी असेल, तो देशभक्त ! आणि..
जो समता विरोधी असेल, तो देशद्रोही !
जो ओबीसी-बहुजन हिताच्या विरोधात असेल, तो देशद्रोही !
अशी नवी आणि सुस्पष्ट व्याख्या आता आपल्याला करावी लागेल ! देशद्रोह्यांना उघडे पाडावे लागेल !

बलिप्रतिपदा समोर आहे. बळीराजा हा ओबीसी-बहुजनांचा प्रेरणापुरुष आहे. ८५ टक्क्यांचे दैवत आहे. त्याचाही कपटाने घात करण्यात आला होता. ओबीसींना देखील वर्षानुवर्षे मूर्ख बनवलं जाते आहे. त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेण्यात आला आहे.

देशद्रोह्यांचं काम देशद्रोही नित्यनेमानं विविध बुरख्यांच्या आडून करतच असतात.. पण आम्ही पिढ्यानपिढ्या मूर्ख का बनत आहोत ? या निमित्तानं त्यांचे चेहरे ओळखू या. स्वतः शहाणे होऊ या ! संघटित होऊ या ! समतेची लढाई गतिमान करू या !

– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *