![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/08/IMG_20200813_120951.jpg?resize=880%2C528&ssl=1)
| मुंबई | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबत पत्रकार संघाच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले (वय ४८) यांचा २८ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय ६१) यांचाही कोरोनाची बाधा झाल्याने सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही पत्रकारांची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून महाविकास आघाडी सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कोरोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला तर कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. दोन्ही पत्रकारांचा मृत्यू कोरोना कक्षात उपचार सुरू असताना झाल्यामुळे सरकारने घोषणेनुसार त्यांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.
याची तात्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरकारने घोषणा केल्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे पत्र दिले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.