गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? ‘महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनातून घणाघाती टीका..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच महाराष्ट्राची बदनामी केली, ते आता माफी मागणार का? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे.

सुशांत सिंह प्रकरणामध्ये बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी याप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची बदनामी केली होती. ‘आता गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय?’ अशा शब्दांत सामनातून शरसंधान साधण्यात आलं आहे. ‘गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनात आज अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकार यांची विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर सामनातून टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

सामनात महाराष्ट्राची माफी मागा असं म्हटलं गेलं आहे. ‘एम्स’नं सुशांत प्रकरणी जो अहवाल दिला. तो अंध भक्त नाकारणार आहेत का? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. तर या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करणारे राजकीय नेते, काही वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफी मागायलाच हवी.’, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ‘ज्यांनी मुंबई पोलीस, महाराष्ट्राची बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत?’, असा संतप्त सवालही सामनातून करण्यात आला आहे. सामना अग्रलेखात पुढे म्हटलं आहे की, ‘जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे साफ वाटोळे होते. बेईमानांनी आता तरी हे समजून घ्यावे.’

सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, “सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. ‘ठाकरी’ भाषेतच बोलायचे तर सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस ११० दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारनं अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे”

शिवसेना बिहार निवडणूक लढवणार?

‘बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले. मुंबई पोलीस सुशांतचा तपास करू शकत नाहीत म्हणून सीबीआयला बोलवा असे किंचाळणाऱ्यांनी मागच्या ४०-५० दिवसांत सीबीआय काय करतेय? हा साधा प्रश्न विचारला नाही. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला’, असंही सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

‘सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!’, नाव न घेता कंगनावरही सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *