धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याची व इतिहास घडविण्याची संधी -गायकवाड

| सोलापूर | राजकीय पुनर्वसनासाठी धनदांडग्या तसेच कारखानदारांना पदवीधर निवडणूकीत उतरवण्याची राजकीय पक्षांची भूमिका पदवीधरांच्या तसेच शिक्षकांच्या मूलभूत हक्कांना अडसर ठरणारी असून सामाजिकदृष्ट्या घातक ठरणारी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोज गायकवाड यांनी करमाळा दौऱ्यात पदवीधर मतदारांसमोर बोलताना केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, गणेश सव्वाशे, माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिव सचिन शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे, सचिव गणेश डोके, रोहित घोगरे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष अजित कणसे, उपाध्यक्ष विकास माळी, कलाध्यापक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार गुंड, प्रा.लावंड, मराठा फोर्ट्सचे राहुल घुमरे, प्रा गावित आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना इंजिनिअर मनोज गायकवाड म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार संघ हा पदवीधर तसेच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा राज्यघटनेने एक पर्याय उपलब्ध करून दिला होता परंतु राजकीय पक्ष आपले कार्यकर्ते व धनदांडग्या कारखानदारांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत. बहुतांशी उमेदवारांचे वय ५० ते ५५ वर्ष असल्यामुळे या सर्व उमेदवारांना पदवीधर शिक्षकांच्या समस्यांची जाण नाही आणि हे सर्व उमेदवार पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी असमर्थ ठरणार आहेत. पदवीधरांसमोर एक सक्षम पर्याय म्हणून आपण उभे असून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला असून अनेक अडचणींना सामोरे जात इंजिनीअर झालो आहे. सर्वसामान्य कुटुंबातील पदवीधर, शिक्षक, त्यांच्या समस्यांची मला जाण असून धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याची व नवा इतिहास घडविण्याची संधी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून मतदारांना मिळणार आहे. आज पर्यंत मी वेळोवेळी पदवीधरांचे प्रश्न समजून घेऊन आवाज  उठवत आलो आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यकर्त्यांचे चोचले पुरवण्यासाठी विधानसभा सभागृह उपलब्ध आहे. परंतु राज्यघटनेने विधिमंडळामध्ये पदवीधर, शिक्षक, साहित्यिक, कलावंत यांच्या रूपात गुणवान प्रतिनिधी यावेत आणि लोकशाही समृद्ध व्हावी या उद्देशाने विधानपरिषदेची रचना करण्यात आली आहे. परंतु राजकीय पक्ष त्या उद्देशाला काळे फासण्याचे पाप करत असून हे लोकशाहीला घातक ठरणार आहे. शिवराय, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांवर माझी भविष्यातील वाटचाल राहणार असून महापुरुषांना अभिप्रेत असलेले कार्य सिद्धीस नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असणार आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

भविष्यकाळात आपण केजी टू पीजी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांना परवडणाऱ्या माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही राहणार असून सर्व शासकीय नोकरदार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवीधरांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. आपण उच्चविद्याविभूषित तसेच तरुण उमेदवार असल्यामुळे समाजातील सर्व घटकांमधून आपणाला पाठिंबा मिळत असून या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंजिनिअर मनोज गायकवाड यांनी करमाळा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते,विविध शाळांच्या संस्थाचालक, शिक्षक पदवीधर मतदार यांच्याबरोबर चर्चा करून आपणास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

” बहुजन समाजात वैचारिक परिवर्तन घडवून संविधानास अभिप्रेत व्यवस्था निर्माण करण्याचे काम संभाजी ब्रिगेड ही संघटना नेहमीच अग्रेसर राहून करत असून पदवीधर मतदारांचे मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी मला पसंती क्रमांक १ चे मतदान देऊन विजयी करण्याचे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *