भिगवन शेटफळगडे रस्त्यावरील प्रवास होणार सुखकर; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याने रस्त्यासाठी अकरा कोटी रुपये मंजूर..

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवन बारामती रस्ता हा कायम वर्दळीचा रस्ता आहे. मात्र भिगवन ते शेटफळगढे दरम्यान च्या परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकासाठी नेहमीचीच डोकेदुखी असलेला. परंतु आता त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना या त्रासातून लवकरच मुक्ती मिळणार आहे.सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने या रस्त्यासाठी अकरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भिगवन बारामती रस्ता हा सातत्याने वर्दळीचा रस्ता असल्याने तसेच बारामती एमआयडीसी तसेच परिसरातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखाने यामुळे सातत्यानं या रस्त्याने अवजड वाहतूक ठरलेलीच.

अशातच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर मदनवाडी घाटातून वर चढणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची “सर्कस” पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला ही दरदरून घाम फुटावा अशीच परिस्थिती असते. त्यामुळे कारखाने सुरू असताना या परिसरात सातत्याने छोटे मोठे अपघात होतच असतात. अनेकांना या रस्त्यावरील अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मदनवाडी घाटातील वळणावर इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश बापू जाधव यांचे अपघाती निधन झाले होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी आले होते तेव्हा या घाट रस्त्यावरील वळणे काढून टाकण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न चांगलाच मनावर घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईल.व कोरोनाचा हा संकटकाळ सरल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल.

त्यानुसार या निधीतून जुन्या भिगवण पुलाजवळ नवीन पुलाची निर्मिती होणार असून त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यातून 47 मीटर लांबीचा व 12 मीटर रुंदीचा पुल या ठिकाणी बांधला जाणार आहे. तेथील झेड आकाराची वळणे काढून टाकली जाणार आहेत. तसेच मदनवाडी हद्दीतील ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुल पाडून तिथे चार कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधला जाणार आहे.32 मीटर लांब व 12 मीटर रुंद आकाराचा हा पूल असणार आहे. तेथीलही झेड आकाराची वळणे काढून रस्ता सरळ केला जाणार आहे.तसेच मदनवाडी घाटातील 7 मीटर रुंदीचा रस्ता 10 मिटर रुंदीचा केला जाणार असून वळणे काढून रस्ता सरळ केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रवास लवकरच सुखकर झालेला पाहावयास मिळणार असून वाहनचालकांनाही दररोजच्या कराव्या लागणाऱ्या कसरतीतून मुक्तता मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *