मोदींनी कोरोना नाही तर हे संपवले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल..!

| नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. विविध मुद्द्यांवरून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. देशामध्ये अचानक करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून जोरदार निशाणा साधला आहे.

‘अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन दिलं होतं पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवण्यात आले. मोदीजींचा जनविरोधी ‘डिझास्टर प्लॅन’ जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा’ असं म्हणत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओदेखील ट्विट केला आहे. ‘कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटीत क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोट्या आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाऊन केलं तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं.’

‘पंतप्रधानांनी २१ दिवसांची लढाई असेल असं सांगितलं होतं पण असंघटीत क्षेत्राचा २१ दिवसांत कणाच तुटला. लॉकडाऊननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण तसं नाही केलं. सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे. या पैशाशिवाय हे उद्योग नाही जगणार. सरकारे काहीच केलं नाही. उलट सरकारने सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला.’

‘लॉकडाऊन कोरोनावर आक्रमण नव्हतं. लॉकडाऊन देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. लॉकडाउन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटीत अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल’ असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *