मुंबईकरांसाठी खूशखबर : विक्रोळी मधील ४०० KV उपकेंद्राचे काम गतीने होणार..

| मुंबई | मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित ४०० के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असा २००९ मध्ये मान्यता मिळालेला हा प्रकल्प इतकी वर्षे रखडणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबईत नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्या अनुषंगाने वीज क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचा आढावा ते घेत आहेत. वर्षा निवासस्थानी विक्रोळी प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा हा विक्रोळी प्रकल्प प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईसाठी १००० मे.वॅ. वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त व्यवस्था २०२३ पर्यंत निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी खारघर उपकेंद्र येथून ४०० केव्ही वीजवाहिनी उभारणे प्रस्तावित आहे. तसेच तळेगाव – कळवा ४०० केव्ही वीजवाहिनीवरुन विक्रोळीपर्यंत ४०० केव्ही वीजवाहिनी तसेच पडघा, नवी मुंबई या ग्रीड उपकेंद्राशी जोडणी करणे आदी बाबी समाविष्ट असून त्यामुळे मुंबईसाठी १००० मे.वॅ. वीजेसाठीची अतिरिक्त व्यवस्था निर्माण करणे प्रस्तावित आहे, अशी माहिती प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी यावेळी दिली.

ठरल्याप्रमाणे टाटा पॉवर कंपनीने पुढील आठवड्यापर्यंत विक्रोळी प्रकल्प उभारणीसाठी जागा अदानी ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीला हस्तांतरीत करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. जागेच्या ताब्यानंतर प्रकल्पाचे काम कोणत्याही स्थितीत 2023 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *