महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सहन करणार नाही, वाचा आज लाईव्ह मध्ये काय काय म्हंटले मुख्यमंत्री..!

| मुंबई | महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे. त्याविषयी मी बोलेन पण आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन पण माझं अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

मराठा आरक्षण बाबत :

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘मराठा आरक्षणावर सर्व पक्षाने एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठिंबा दिला. उच्च न्यायालयात याला आव्हान दिलं ते आपण जिंकलो. सर्वोच्च न्यायालयात आता लढत आहोत. पहिल्या सरकारने जे वकील दिलेत ते बदलले नाहीत. वकील कमी न करता आणखी वकील वाढवत आहोत. सर्वोच्च न्यायालयात कुठेही कमी पडलेलो नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘आपण दिलेलं आरक्षणाला स्थगिती देण्याचा अनपेक्षित निर्णय़ दिला गेला. यावर सविस्तर चर्चा करत आहे. ज्या संस्था पोटतिडकीने मागणी मांडत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे ठरवून बाजू मांडली. तरी हा निर्णय आला.’

न्यायहक्कासाठी सरकार वचनबद्ध

विरोधीपक्ष नेत्यांनी देखील कोणतंही राजकारण न करता आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाला मला एक विनंती करायची आहे. अन्याया विरोधात लढा. पण सरकार साथ देत नसेल तेव्हा. पण सरकारने तुम्हाला साथ दिली आहे. तुमच्या मागण्यांना न्याय दिलेला आहे. पण आव्हान दिल्यानंतर सरकार तुमच्यासाठी न्यायलयात बाजू मांडत आहे. तुमच्यासाठी भांडत आहोत. सर्वांच्या सूचना घेतल्या आहेत. पुन्हा कोर्टात जाणार आहोत. निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी सरकार कमी पडणार नाही. सरकार मराठा समाजासोबत आहे. कोरोना संकटामुळे आंदोलन, मोर्चे काढू नका. न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. एकजुटीला तडा जाईल असं करु नका. आपण एकत्र आहोत. असं देखील मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा ही त्रिसूत्री पाळा

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’ पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील १२ कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, ५०-५५ वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे ८०% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत. मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही गोष्टी सुरु केल्या आहेत. कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत. वाहतुकीचे निर्बंध शिथिल केले आहेत. आयुष्याची गाडी मागावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. आयुष्य पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अनेक संकटं महाराष्ट्रावर आली. कोरोनासोबत, पाऊस, विदर्भातील पूर अशी स्थिती अशी संकटं महाराष्ट्रावर आली आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *