महाविकास आघाडीतील काँग्रेस मंत्र्याची काँग्रेस पक्षातील नेत्यांवरच घणाघाती टीका ..

| मुंबई | आज होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी आपल्याच पक्षातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिल्याचं समोर आलं. या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे, यानंतर सुनिल केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.

गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असं ट्विट धक्कादायक विधान सुनिल केदार यांनी केलं आहे.

सुनिल केदार यांच्याआधी संजय निरुपम यांनीही अशाप्रकारे पत्र लिहिणाऱ्यांवर टीका केली होती. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी. काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सोनिया गांधींनीच पक्षाचं अध्यक्ष असावं. सोनिया गांधी तयार झाल्या नाहीत, तर राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारावं, अशी मागणी करणारा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *