या दोषी सापडलेल्या मंत्र्याने तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांची उध्दव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी – चंद्रकांत पाटील

| मुंबई | महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वत:हून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

‘राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे,’अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते,’असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *