राजस्थानात ऑपरेशन कमळ फसले; हा राजकीय विकृतीचा पराभव ; सामनातून खरपूस टीका..!

| मुंबई | गेल्या महिनाभरापासून राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले. यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक आमदार दिल्लीहून जयपूरला परतले आणि आपल्या घरी पोहोचले. यानंतर आता शिवसेनेने राजस्थानातील राजकीय नाट्यावर सामनामधून भाष्य केले आहे. यामधून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच!’ असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

अग्रलेखात काय?

✓ या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो.
✓ सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही. सत्ता व दबावाचे सर्व मार्ग अवलंबून अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या भूमीवर सरकार पाडणाऱ्यांना मात दिली.
✓ सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही.
म्हणजे महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी उरकूनही जी फसगत झाली, तोच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला. पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा?
✓ महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱया नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता?
✓ देशावर आर्थिक व बेरोजगारीचे भयंकर संकट कोसळले आहे. त्यावर कोणी ठोसपणे बोलायला तयार नाही. कोरोनाच्या संकटाने लोकांचे जीवन संकटात आले व मृत्यूचा वेग वाढतो आहे. तेसुद्धा राज्यकर्त्यांच्या खिजगणतीत नाही. उद्योग-व्यवसाय पूर्ण कोलमडून पडला आहे. तो सावरण्याऐवजी हे लोक विरोधकांची सरकारे पाडायला निघाले आहेत.
✓ महाराष्ट्र असो की राजस्थान, पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *