वीज दराचा प्रश्न चिघळला, मनसे, आंबेडकर यांचा आक्रमक पवित्रा..!

| मुंबई | वाढीव विज बिलांमुळे राज्यातील वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत. असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. यानंतर सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच मनसेसह प्रकाश आंबेडकरांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

विल बीज कमी होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधक सातत्याने सरकारवर निशाणा साध आहेत. दरम्यान आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढीव वीज बिलाच्या समस्येवर तोडगा काढून सामान्यांना दिलासा देणार का, याकडे आता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसेची आक्रमक भूमिका :

नितीन राऊतांनी विज बील भरावे लागणार हे स्पष्ट केल्यानंतर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते,” असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. यावरुन मनसे लवकरच वाढीव वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेणार हे स्पष्ट होत आहे. तसेच यासंदर्भात मनसेची आज महत्त्वाची बैठकही होणार आहे.

बिल भरु नका प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन :

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी जनतेला वीज बिल भरु नका असे आवाहन केले आहे. ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. बिल भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला. लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कोणतेही वीजबिल माफ होणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले होते. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जनतेला आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *