व्यक्तिवेध : स्वतःचे शरीर बहुजनांच्या शिक्षणासाठी झिजवणारे चंदन म्हणजे कर्मवीर अण्णा..

…..आज २२ सप्टेंबर अण्णांचा जन्मदिवस. आपल्या ७२ वर्षांच्या आयुष्यात केवळ ६ वी नापास एवढे शिक्षण होऊनही ज्यांनी लोकशिक्षणाचा ध्यास घेतला त्या कर्मवीरांची आज जयंती. भाऊराव ६ वी नापास झाले. ते पास व्हावेत म्हणून शाहू महाराजांनी कुलकर्णी गुरुजींना विनंती केली.. पण त्यांना अपयश आले. बहुजनामधील एखाद्या मुलाने आपली गुणवत्ता सिद्ध केल्यावर ज्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते, त्याच प्रवृत्तीच्या भार्गवराव कुलकर्णी यांनी भाऊराव बसतो तो बेंच पुढच्या वर्गात नेईल पण भाऊरावास मी पास करणार नाही असा हट्ट धरला..

पण शाहू राजांच्या प्रेरणेने भाऊरावांचे शिक्षण पूर्ण झाले. एकदा घरात पाहुण्यांसमोर वडील पायगोंडा पाटील यांच्याकडुन अपमान सहन करावा लागला. म्हणून भाऊरावांनी घराबाहेर पडून थेट सातारा गाठला. तेथे शिकवणी सुरू केली. संस्कृतसह अनेक विषयांवर प्रभुत्व मिळविले. सत्यशोधक चळवळीचे काम हाती घेतले. त्याच दरम्यान लोकशिक्षणाचे मोठे ध्येय उराशी बाळगून सन १९१९ रोजी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यातून सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण देण्याचा संकल्प केला. त्यासाठी संस्थेचे बोधचिन्ह म्हणून वड या वृक्षाची निवड केली. ज्याचे ऐतिहासिक महत्त्व बुद्धांपासून आहे. तो वारसा भाऊरावांनी जपला.

त्यांनी व्हॅ!लंटरी शिक्षण म्हणजे खाजगी शाळाना सरकारी अनुदान चालू केले. भाऊराव निर्व्यसनी होते. त्यांनी शाळांमध्ये वसतिगृहाची स्थापना करून मुलांना निवासी सोय उपलब्ध करून दिली. ते सर्व मुलांची पोटच्या लेकरांपेक्षा अधिक काळजी घेत असत. अगदी अंथरून पांघरूनापासून ते खाण्यापिण्यापर्यंत. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना साताऱ्याहून जेवण घेऊन येत. मुलांना अप्पा बळवंत चौक येथे बोलवून इंग्रजी पुस्तके त्यांच्या आवडीनुसार खरेदी करत.

भाऊरावांचे ज्ञानदेव घोलप, बाबाजी भिंगारदिवे, अप्पालाल शेख यांसारखे अनेक विद्यार्थी शिक्षणाधिकारी यासारख्या मोठ्या पदावर पोहोचले होते. अस्पृश्यांना विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही, म्हणून त्यांनी विहिरीचा रहाट मोडला होता. भाऊराव पुण्यात जलशाच्या कार्यक्रमात ढोलकी वाजवायचे त्यांना प्रबोधनाचे मोठे वेड होते. ते विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी खेडोपाडी अनवाणी पायाने फिरायचे. वस्ती तेथे शाळा हे त्यांचे ध्येय होते. भाऊराव गावोगाव फिरत. मुलांसाठी धान्य गोळा करीत. त्याकाळी रयत परिस्थितीने गरीब पण अंतःकरणाने श्रीमंत होती. पण हा सर्व त्रास कशासाठी, हे सर्व कशासाठी, शिकणारी मुले काय त्यांच्या घरची नव्हती, नात्यागोत्यातील नव्हती. मग एवढा अट्टाहास का तर अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची मुले शिकावीत, आपला बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा, शहाणा व्हावा. हा त्या पाठीमागचा उद्देश.

अण्णांचा दिवस मुलांबरोबर पहाटे ४.३० ला चालू व्हायचा ते रात्री ११ वाजेपर्यंत. अभ्यास, खेळ, प्रबोधन, वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या. इ. कामे मुले आनंदाने करत. मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या खाण्यापिण्यासाठी अणांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्वतःचे १०० तोळे सोने मोडले, पण शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही. भाऊरावांचे एकात्मतेचे आणि स्वावलंबाचे कार्य देशाला मार्गदर्शक आहे.

“अण्णा नेहमी म्हणायचे, एका श्रीमंताने १ लाख रुपये देण्यापेक्षा १ लाख लोकांनी १-१ रुपया दिलेला अधिक मोलाचा. अण्णांनी १९४० साली सातारा येथे श्री. शिवाजी महाविद्यालय नावाचे कॉलेज काढले, तेव्हा एक व्यापारी त्यांच्याकडे आला व त्याने ते कॉलेजचे नाव बदलण्याची विनंती केली. तेव्हा आण्णा म्हणाले
“प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचे नाव बदलेन पण शिवाजी राजांचे कॉलेजला दिलेलं नाव मी बदलणार नाही” असे म्हणणारे भाऊराव पाटील निस्सीम शिवप्रेमी होते.

…जनतेने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले. म्हणूनच लोकांनी त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी देऊन गौरविले. पुढे त्यांना पदमभूषण हा पुरस्कार मिळाला. खरं तर त्यांच्या कार्याची उंची ही जागतिक आहे. त्यामुळे त्यांना नोबेल मिळावा एवढ्या ताकदीचे त्यांचे कार्य आहे. पण बहुजन महापुरुषांच्या वाट्याला पुरस्कार नाही तर तिरस्कार येतात. हा पारंपारिक इतिहास आहे. कारण आमच्या हिरोंना झिरो केलंय आणि त्यांनी त्यांच्या झिरोंना हिरो केलंय हे आमच्या लक्षात आलेच नाही. आज समाज जागा झालाय, प्रबोधन वेगाने होतंय. म्हणून आज खऱ्या कर्मवीरांपुढे नतमस्तक व्हावेच लागेल..

कर्मवीरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन..

– सोमनाथ गोडसे ( वक्ता व इतिहास अभ्यासक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *