शंकरराव गडाखांचा अधिकृत सेनेत प्रवेश; नगर मध्ये पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढणार..!

| मुंबई | अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे आज हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नगरमध्ये शिवसेना आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

आज दुपारी शंकरराव गडाख यांनी मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. मिलिंद नार्वेकर यांची शंकरराव गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने विधानसभेत गडाख अपक्ष निवडून येताच नार्वेकर यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता. सेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अखेर गडाख यांनी सेनेत प्रवेश केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसऱ्या पिढीतील दोन्ही कुटुंबातील सदस्य आता शिव बंधनात बांधले गेले आहेत.

नगर जिल्ह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्तबर नेते आहेत. नगर शहरातील सेनेचे माजी मंत्री व उप नेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गडाख यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होणार आहे. माझ्या शिवसेना प्रवेशामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल असे, असं गडाख यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यवरील करोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे. माझ्या वडिलांचा व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध होते. गेल्या १० वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली. त्या विश्वासाला पात्र राहून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार आहे व शिवसेना वाढीसाठी झटणार आहे. शिवसेना हा पक्ष शेतकरी, कष्टकरी तसेच सर्व सामान्य जनता यांच्या बरोबर असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *