३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम, मिशन बिगीन अगेन सुरूच राहील..!

| मुंबई | जगावर असणारं करोनाचं संकट टळण्याकडे लक्ष लागलं असतानाच नव्या करोनावताराचं सावट गडद होऊ लागलं आहे. भारतातही मंगळवारी करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही करोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. यामुळेच करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं जाहीर केलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार करोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगितलं आहे. तसंच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.

याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत.

देशात करोनाची दैनंदिन रुग्णवाढ आणि बळींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. देशभरात मंगळवारी १६,५०० रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६८,५८१ आहे. इतर देशांच्या तुलनेत आपली स्थिती चांगली असली तरी नव्या करोनामुळे आपण आणखी खबरदारी घ्यायला हवी, असं मत निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *