भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवरुन जयंत पाटील यांनी टोला लगावला.

 ‘काही लोक राज्यात राजकारण करत आहेत. महाराष्ट्राचं काहीही होवो, त्यांना राजकारणच करायचं आहे. विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे, काही सूचना असतील तर त्या आम्हाला द्या, आम्ही निश्चित कार्यवाही करू. सारखा राज्यपालांना त्रास देऊ नका. काही म्हणणं असेल तर मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगा. तुमच्या सल्ल्याचं स्वागत असेल,’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. 

‘राज्यात कोरोनाशी आमचं युद्ध चालू आहे, पण भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं, सरकार उलथवणं यात जास्त रस आहे. राज्यातील जनतेला कळून चुकलंय की भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही, त्यांना पुन्हा हे सरकार पाडून महाराष्ट्रात आपलं सरकार आणणं किंवा राष्ट्रपती राजवट आणण्यात रस आहे’, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला होता. त्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री व अधिकारी यांची बैठक लावली होती, परंतु या बैठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत,  त्या ऐवजी मिलिंद नार्वेकर यांनी सहभाग घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *