![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/07/PhotoGrid_1595507270016.jpg?resize=720%2C528&ssl=1)
“आदित्य गोळे भाऊ ४०० च्या आसपास योजना आहेत ज्यातील ६० अशा आहेत ज्या खासदारांना स्वतः वैयक्तिक पातळीवर अमलात आणता येऊ शकतात, कलेक्टर ऐकणारा हवा वगैरे काही नसत खासदाराला जनते प्रती उत्तरदायित्व ची भावना असली की झाल” सी आर पाटील साहेब आमच्या ग्रुपशी वेब एक्स ऍप वरून बोलत होते. निमित्त होते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ने आयोजित केलेल्या सेमिनार चे ज्यात संपूर्ण भारतातून विद्यार्थी जमले होते. पाटील साहेब मीटिंगला येण्यापूर्वी त्यांच्या मतदार संघातील परराज्यातील कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था करत होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्राथमिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं अस त्यांचं प्रतिपादन होत.
नुकतच पाटील साहेबांना गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. आपल्या मराठी मातीचा गौरव गुजरात राज्याने केला.
पाटील साहेबांचा मोबाईल कधीही स्वीय सहाय्यक कडे नसतो. ते स्वतः सगळे फोन घेतात. जर उपलब्ध नसतील तर मिस्कॉल बघून त्या माणसाला नंतर फोन करतात. छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवणारे त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारे मराठमोळे पाटील साहेब जेव्हा ६८९००० च्या मताधिक्याने २०१९ साली संसदेत नवसारी या गुजरात मधील मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून येतात तेव्हा आश्चर्य वाटत नाही. याचे कारण पाटील साहेबांचा दांडगा जनसंपर्क आणि समरसतायुक्त झोकून देऊन केलेले पारदर्शक काम. ह्या संघटन कौशल्याच्या जोरावरच त्यांना गुजरातच्या अध्यक्षपदाची धुरा मिळाली हा त्यांच्या आजवरच्या कामाचा गौरवच.
आम्हा विद्यार्थी मित्रांना पाटील साहेब समरसून बोलत होते. सांसद आदर्श ग्राम योजना लागू करतानाचा प्रसंग त्यांनी सांगितला. त्यांनी चिखली या गावाची निवड केली होती. ५० पेक्षा जास्त योजना ह्या एकाच गावात लागू करून पंचक्रोशीतील नागरिकांना आश्चर्याचा सुखद धक्काच जणू त्यांनी दिला होता. चिखली गाव हे मागासलेले. कोणी फारसे ह्या गावाकडे फिरकत ही नसे. तरुण मुले कामासाठी बाहेर पडायची, साध्या मूलभूत सोयी देखील गावात नव्हत्या. पण लोकसहभाग, तरुण कार्यकर्त्यांनी टीम आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन मेहेनत घ्यायची इच्छा ह्या जोरावर बघता बघता गावाचा कायापालट झाला. मागील दहा बारा वर्षात गाव सोडून गेलेले युवक गावाकडे परतु लागले. मुलांची गावात राहून लग्न जमू लागली. सुकन्या समृद्धी योजनेमुळे १० वर्षांपेक्षा लहान मुलींची बँकेत खाती उघडली जाऊन त्यांच्या भविष्यातील खर्चाची चिंता मिटू लागली. बेटी बचाव बेटी पढाओ मुळे स्त्री भ्रूण हत्या कमी होऊन बाल लिंग गुणोत्तर सुधारू लागले. उज्वला योजनेचे यश ही दृश्य स्वरूपात दाखवले. नवसारी जिल्ह्यातील शेकडो गावे धूर मुक्त झाली.
स्वतः शेतकरी आणि उद्योगपती असलेले पाटील साहेब यांनी १९८९ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते भाजपा मध्ये प्रवेश केला होता. गुजरात मध्ये शिवजयंती गणेश उत्सव आणि कृष्ण जन्माष्टमी उत्सव रक्तदान शिबिर यांच्या माध्यमातून त्यांनी सुरत, नवसारी आदी परिसरात लोकांना भाजपशी जोडले. २००९ साली नवीन रचने प्रमाणे नवसारी लोकसभा मतदार संघातून त्यांची लोकसभेवर निवड झाली. स्वत:च्या कार्यालयाला आय एस ओ प्रमाणपत्र घेणाऱ्या खूप थोड्या खासदारांमध्ये पाटील साहेब यांचा नंबर लागतो. पंतप्रधान मोदीजी यांचा जवळचा विश्वासू सहकारी म्हणून मोदींच्या वाराणसीतील मतदार संघातील विकासकामं पाटील साहेब सांभाळतात हे त्यांच्याकडून ऐकताना आमच्या अंगावर एक प्रकारचे स्फुरण चढले. उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये ह्या न्यायाने काम करणाऱ्या मराठी नरोत्तम सी आर पाटील साहेब यांना गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अनेक शुभेच्छा.
– आदित्य अरविंद गोळे, बदलापूर