अभ्यासक्रमाचे ओझे घटले, २५% अभ्यासक्रमात कपात

| मुंबई | कोरोना संसर्गाचा राज्यभरात उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. अभ्यासक्रम कपातीचा निर्णय फक्त २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापुरताच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचे वर्षभरातील कोणतेही अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार नाही.

दरवर्षी जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष यंदा कोरोना संकटामुळे फक्त ऑनलाइन स्वरूपात अंशत: सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर अपुऱ्या कालावधीत अभ्यासाचे दडपण येऊ नये, यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्या परिषद, बालभारती आणि राज्य शिक्षण मंडळ यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे गायकवाड म्हणाल्या.

सर्वत्र डिजिटल सोय नसल्याने प्रस्ताव
डिजिटल व्यासपीठाची उपलब्धता सर्वत्र नसल्याने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव विद्या परिषद (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) मार्फत देण्यात आला होता. राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी देऊन २५% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक इयत्तेचा प्रत्येक विषयाचा नेमका कोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, त्याची यादी विद्या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनामुळे एकूण १०१ विषयांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी
२२ प्राथमिक विभाग
२० माध्यमिक विभाग
५९ उच्च माध्यमिक विभाग

सविस्तर माहिती या ठिकाणी उपलब्ध : इयत्तानिहाय आणि विषयनिहाय जो २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, त्याची सविस्तर माहिती www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या संकेतस्थळांवर उपलब्ध केली जाणार आहे. दरम्यान, भाषा विषयातील गद्य, पद्य व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आल्या आहेत..

यावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :

• पाठ्यपुस्तकात अनावश्यक भाग नसतोच..
कोणतेही पाठ्यपुस्तक तयार करताना, त्यातून अत्यावश्यक ज्ञान मिळावे, हाच हेतू असतो. अशा परिस्थितीत, मात्र प्रत्येक विषयाचा पाया पक्का करणारे कुठलेही भाग वगळले जाणार नाहीत, याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. डॉ. वसंत काळपांडे, माजी संचालक, राज्य शिक्षण मंडळ, बालभारती

• वगळलेल्या पाठ्यक्रमावर परीक्षेत प्रश्नही नाही..
यंदा कुठल्याही मूल्यमापनामध्ये वगळण्यात आलेल्या पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. – दिनकर पाटील, संचालक , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

• विषयाचा पाया पक्का करणारे भाग वगळू नये.. मग अभ्यासक्रम असेच वगळत राहणार का?
प्रत्येक विषयाचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय, हा ‘श्रेय’ घेण्याचा प्रकार आहे. कोरोना संसर्ग अजून किती दिवस राहणार, याचा अंदाज कुणालाही नाही. आज २५ टक्के अभ्यासक्रम गाळला, नंतर ५० व ७५ टक्के असा अभ्यासक्रम वगळणार आहात का ? अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ञ

• ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा, निर्णय योग्यच..
राज्य शासनाचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय योग्य आहे. ऑनलाइन शिक्षणाचा कितीही गाजावाजा केला, तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह म्हणजे स्मार्टफोन, टीव्ही सेट्स उत्पादित करणाऱ्या कंपन्या यांच्यासाठी ‘एजंटगिरी’ करण्यासारखे आहे… डॉ. श्रुती तांबे, शिक्षणतज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *