आज पुन्हा मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा..!

| नवी दिल्ली | देशातील लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून १७ मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असणार आहे. अशातच देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊन १७ मे रोजी संपणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आज पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागलं आहे.  कोरोना विरोधात लढा देण्यासाठी देशाची तयारी आणि पुढिल रणनितीवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे.  ही बैठक दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची ही पाचवी बैठक असणार आहे. आज पार पडणाऱ्या या बैठकीत देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे होणारे फायदे आणि देशात कोरोनाशी लढण्यासाठी आखण्यात येणाऱ्या पुढिल रणनितीवर चर्चा होऊ शकते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० मार्च, २ एप्रिल, ११ एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

याआधीही देशातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्या सर्वांची मतं जाणून घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *