राजस्थानात राजकीय भूकंप येण्याची शक्यता..! मध्य प्रदेश पॅटर्न पुन्हा येणार..?

| नवी दिल्ली /राजकीय प्रतिनिधी | तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेल्या काँग्रेससाठी राजस्थान नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. राजस्थानमधील सत्तेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. दरम्यान काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मागे केला होता. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपाची राजस्थानातही पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदारही भाजपात दाखल झाल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात येऊन कोसळलं. त्यानंतर भाजपानं मध्य प्रदेशातील सत्तेची सूत्र हाती घेतली. या घटनेला तीन महिने लोटत नाही, तोच राजस्थानातही अस्थिरतेचे हादरे जाणवू लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर काल (११ जुलै) राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेले. या आमदारांना हरयाणातील गुरुग्रामध्ये एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. सुरवातीपासूनच मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अविश्वास असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात असून, त्यामुळे सचिन पायलट हे नाराज असल्याचं समजतं.

आता हे प्रकरण काँग्रेसचे राजस्थान मधील सरकार सोबत घेऊन कोसळते का.? की काँग्रेस हाय कमांड यावर काही तोडगा काढते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांचे मन वळविण्यासाठी सचिन पायलट यांनी प्रयत्न केले होते, परंतु आता त्यांची स्वतः चीच मानसिकता वेगळी झाली आहे का..? हे येणारा काळच सांगेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *