सांगली काँग्रेसचा गड, ताकदीने लढून जिंकायचाय; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

सांगली : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता तिढा आणखीनच वाढला आहे. एकीकडे संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर असताना सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. असे असताना विशाल पाटील यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

काँग्रेसने जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा देखील आहे. आपण लढू आणि जिंकू असा विश्वास या पत्रात विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम हे सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय

विशाल पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. गुलाबराव पाटील, स्व. प्रकाश बापू पाटील, स्व. मदन पाटील, स्व. आर आर पाटील आणि शिवाजीराव देशमुख यांची नावे लिहिली आहेत. परंतु या पत्रामध्ये विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांचे पिता आणि दिवंगत नेते स्व. राजारामबापू पाटील यांचं नाव वगळलंय.

एकीकडे विश्वजीत कदम हे प्रयत्न करीत आहेत असे म्हटले जाते. तर दुसरीकडे विशाल पाटील हे जयंत पाटील यांचे नाव देखील घेत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

पत्रात काय लिहिलं आहे ?

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरु आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतूट नातं तयार झालं आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने ‘सांगली काँग्रेसची’च या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात, याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे.

तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *