अन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..

दोन दिवसांवर (28 मार्च) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा घेऊन ठेपली आहे. यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऐतिहासिक पद्धतीने ऑनलाईन होणार आहे. खरे पाहता अशा सभेत केवळ विधायक निर्णयच चर्चेला येणे अपेक्षित आहे; कुठलाही वादग्रस्त निर्णय रेटण्याचा प्रयत्न कोणताही सुज्ञ सत्ताधारी करणार नाही. यातच पाच वर्ष मांडीला मांडी लावून बसलेले संचालक एकीकडे राजीनामा देण्याचे भाष्य करत आहेत तर पूर्वाश्रमीच्या चेअरमन यांना दोषी ठरवत दुसऱ्या गटाकडे गेलेले संचालक आताचा कारभार चांगला असल्याचा दावा करीत आहेत. मात्र त्या चेअरमन यांच्या काळात विद्यमान कुठल्याही संचालकाने खरे बोलण्याचे धाडस का दाखविले नाही.? हा स्वराज्य मंडळाचा खरा सवाल आहे. खरेपणाने वागता येत नसेल तर खरेपणाचा आव फार दिवस टिकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षापासून एकाच मंडळाचे अनेक भाग होत तेच तेच पदाधिकारी वेगवेगळ्या मंडळात जाऊन सत्ता उपभोगताना दिसत आहे. कोणताही पर्याय निवडला तरी सभासदांच्या पदरी निराशाच येत आहे. याने सभासद विटला आहे, परिणामी यांच्या चिखल फेकाफेकीच्या, जिरवाजिरवीच्या आणि शिक्षकांना बदनाम करण्यापर्यंत नेणाऱ्या राजकारणाशी फारकत घेण्याचा निर्णय स्वराज्य मंडळाने घेतलेला आहे. ” आम्हाला तुमच्या सावळ्या गोंधळात पडायचंच नाही, एकाला झाकावे आणि एकाला काढावे अशा भुलथापी राजकारणाला मूठमाती देण्याची वेळ आली आहे, असा एल्गार स्वराज्य मंडळ करत असल्याने स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..!

सभासदांना एक नवा पर्याय, एक सक्षम आणि अभ्यासू पद्धतीने प्राथमिक शिक्षक बँकेला नव्या उंचीवर नेण्याचा वारू स्वराज्य मंडळाच्या रूपाने सामान्य सभासदांना दिसत आहे. आजपर्यंत सत्तेवर आलेल्या मंडळींनी स्वतःचा खिसा भरण्याचे पातक केले आहे, असे सर्व जुने मंडळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण यातून सभासदांना किती फायदा झाला याचे भान कोणालाही नाही. सभासदांच्या हितासाठी या गोंडस नावाखाली अनेकदा पक्ष बदलून या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेलेले लोक दिसत आहेत. अर्थात त्याच्या येण्याजाण्याने राजकारणात फारसा फरक पडेल असे चित्र यंदा नाही.

काय म्हणणं आहे स्वराज्य मंडळाचं :

✓ सन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून सात हजार रुपये कपात करून मग त्यावर कर्ज देण्याचा तुघलकी निर्णय या संचालक मंडळाने कोणालाही विश्वासात न घेता घेतलेला आहे, या तुघलकी निर्णयाचा स्वराज्य मंडळ जाहीर निषेध करत आहे.

✓ वर्षभर चाललेली कन्यारत्न योजना अचानक कन्यादान योजनेत परावर्तीत करण्यात आली त्याबद्दल अभिनंदन, मात्र कन्यारत्न योजना रद्द करण्याचे कुठलेही नैतिक कारण सत्ताधाऱ्यांना देता आले नाही. याबाबत स्वराज्य मंडळाची तीव्र नाराजी याठिकाणी व्यक्त होत आहे.

✓ कुटुंब आधार योजना ही सर्व सभासदांना लागू आहे, केवळ डीसीपीएस धारकांना ही मदत केली असा डंका कोणीही कोणत्याही मंडळाने वाजवू नये, ही प्रत्येक मंडळाला नम्र विनंती आहे.

✓ वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या दोन दिवसात होत आहे, त्या सभेसाठी सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा. मात्र ज्या सभासदांच्या जीवावर आणि कामावर ही बँक चाललेली आहे त्यांच्या हिताचे निर्णय आपल्याच्याने होत नसतील तर किमान त्यांची आर्थिक हानी होणारे आपल्या हातून घेतले जाऊ नयेत, याप्रमाणे मागणीचा विचार आपण करावा ही नम्र विनंती.

✓ याही उपर शिक्षक बँकेच्या माध्यमातून एकाही सामान्य सभासदावर अन्याय झाल्याचे निदर्शनास आल्यास स्वराज्य मंडळ त्यांच्या आक्रमक पद्धतीने आपणाला उत्तर देईल हेही याठिकाणी नोंदविणे गरजेचे आहे. सर्वसामान्य सभासदांच्या काही अपेक्षा किंवा अन्य मागण्या असतील तर त्या नक्कीच कळवाव्यात, असे आवाहन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *