मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी समावेशासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..!

| महेश देशमुख / सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्यांचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने आता मराठा समाजाचा सरसट ओबीसीमध्ये समावेश करावा,यासाठी यापुढे संभाजी ब्रिगेड मोठा लढा उभारणार असल्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप म्हणाले, मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासह महाराष्ट्रातील लाखो मराठे आणि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी करत आहे. आता यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले. याबाबत प्रत्येक सरकारच्या काळात अनेक आंदोलने केली, सरकार सोबत विरोधी पक्षांना देखील यासाठी साकडे घातले, मात्र संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे प्रत्येक सरकारने व  विरोधी पक्षांनी साफ दुर्लक्ष केलं, यामुळे मराठा समाजाचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन समाजाचं मोठं शैक्षणिक नुकसान झाले आहे.  समाजाची एक पिढी या प्रक्रियेत वाया गेली आहे, अनेकांचे बलिदान गेले. तर मराठा समाजातील अनेक तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

असे असताना आता मराठा आरक्षण देखील सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवले आहे, त्यामुळे यापुढे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश करावा, यासाठी येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने मोठा लढा उभा करणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण पाहता गरीब मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मराठा समाजामध्ये ०५ टक्के श्रीमंत वर्ग आहे, तर ९५ टक्के मराठा समाज हा गरीबच आहे. त्यामुळे सरकारने आता या मराठा समाजातील युवकांचा आक्रोश बाहेर येण्याआधी संभाजी ब्रिगेडच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ हा निर्णय घ्यायला पाहिजे असेही सचिन जगताप म्हणाले.

मराठा समाजासाठी आरक्षण रद्दबातल ठरविण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. याचा मराठा समाजातील अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. विशेषतः समाजातील ९० टक्क्यांहून अधिक असलेल्या गरीब मराठा घटकांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी आहे.मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला ओबीसीत आरक्षण आहे. त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण मर्यादा वाढवून ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. 

तात्यासाहेब पाटील , जिल्हाध्यक्ष , मराठा सेवा संघ, पंढरपुर विभाग

मराठा समाजातील विशेषतः मोठ्या संख्येने असलेल्या गरीब मराठ्यांचे पुढिल अनेक पिढ्यांवर परिणाम होईल असे खुप मोठे नुकसान होणार आहे. केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून टिकणारे संवैधानिक असे आरक्षण मराठा समाजाला  द्यावे व मराठा समाजाला न्याय द्यावा.

नीलेश देशमुख, तालुकाध्यक्ष , मराठा सेवा संघ, माढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *