![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/12/images-2020-12-19T102315.182.jpeg?resize=743%2C413&ssl=1)
| अहमदनगर | राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून पारनेर तालुक्यातील १० व नगर तालुक्यातील १ अशा एकूण ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. तर ६ गावांतील एका जागेमुळे त्या गावची निवडणुक लागली आहे. विशेष म्हणजे आमदार लंके यांच्या प्रयत्नातून जवळपास २१० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आ.लंके यांचे स्वत:चे गाव असणारे हंगा ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे.