पाव, ब्रेड, नेलकटर, कंगवा, याबरोबरच भाज्या, सफरचंद, अननस, फ़ुलकोबी, ढोबळी मिरची सह १०९ मजेशीर चिन्ह ग्रामपंचायत निवडणूक करणार रंगतदार..!

| मुंबई | लॅपटॉप, मोबाईल चार्जर, माउस, संगणक ते ढोबळी मिरची, फुल कोबी, अननस, हिरवी मिरची, आले, अशा मजेशीर आणि थोड्या वेगळ्या असलेल्या चिन्हानी २०२१ मधील पहिली वहिली होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक अतिशय रंगतदार आणि धमाल होणार आहे.

येत्या १५ जानेवारीला राज्यातील ३५ जिल्ह्यातील एकूण १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींची मुदत १७ मार्च २०२० रोजी संपली होती. पण कोविड-19 या विषाणूमुळे त्यावेळी संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात स्थगित करण्यात आला होता. लॉकडॉउन मुळे तो संपूर्ण रद्द करण्यात आला. आता नव्याने अधिसूचना जारी करत ही निवडणूक होत आहे.

यावेळी निवडणूक आयोगाने १०९ चिन्हांची यादी जाहीर केली आहे. कोणतीही निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा चिन्हांचे महत्व खूप असते. लक्षात राहणारे चिन्ह मिळावे म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. निवडणूक प्रचारात मोठ्या खुबीने या चिन्हांचा वापर केला जातो.

साधारणपणे ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. येथील स्थानिक गट, आघाडी यामधून पॅनल तयार होते. त्यामध्ये विविध पक्षीय लोकांची सरमिसळ असते. त्यामुळे अन्य चिन्हे निवडणुकीत वापरली जातात.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या १०९ चिन्हांची यादी पाहिली तर ती गंमतीदार वाटते. या चिन्हामध्ये पाव, ब्रेड, नेलकटर, कंगवा, याबरोबरच भाज्या, सफरचंद, अननस, फ़ुलकोबी, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, मका, आक्रोड अशी संपूर्ण भाजी मंडई चिन्हातून आणण्यात आली आहे.

याचबरोबर संगणक, पेन ड्राइव्ह, मोबाईल चार्जर, माऊस, स्विच बोर्ड, लॅपटॉप, ही विकासात्मक चिन्हे पहिल्यांदा देण्यात आली आहेत. यासह रिक्षा, फुगा, बादली, केक, कपबशी, चष्मा, हॉकी, किटली, टोपली, पांगुळ गाडा, विहीर, शिट्टी, चमचा, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, कॅरम बोर्ड आदी १०९ विविध चिन्हांचा समावेश आहे. कोणत्याही उमेदवाराला चिन्ह निवडताना पाच चिन्हे प्राधान्य क्रमाने द्यायची असून त्यातील एक चिन्ह निवडावे लागणार आहे.

दरम्यान या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर्स देण्यात येत असून त्या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पद्धतीने धनदांडगे लोक ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करतील आणि हे धोकादायक असल्याचे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

कपबशी, अंगठी, स्टुल, रोडरोलरसह किटलीसाठी सर्वाधिक मागणी :

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणासाठी उमेदवारांनी चिन्ह निवडीवर विशेष भर दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १०९ मुक्त चिन्हांचा पर्याय दिला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता गावागावांत प्रचार मोहीम राबविण्यास प्रारंभ होत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पराभवासाठी योग्य चिन्हासह रणनीती आखणीला वेग आला आहे. त्यामुळे गावोगावी रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबत सुरु आहे. निवडणूक चिन्हांमध्ये भाजीपाला आणि विविध फळांसह गृहोपयोगी वस्तूंचा समावेश केला आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १०९ मुक्त चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिला आहे. त्यात विविध फळे, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, बॅट, छत्री, अंगठी, फळा, बस, रेल्वे, कपाट, पेन, नारळ, खेळांचे साहित्य, काडेपेटी, शिवणयंत्र, ब्रश, कढई, किटली, पंख्यासह जीवनावश्यक वस्तूंचे पर्याय ठेवले आहे. उमेदवारांना हवे असलेल्या निवडणूक चिन्हासाठी अर्ज करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *