पंजाबचे निकाल, भाजपचा माज आणि ईव्हीएमचं भूत..

नुकत्याच पंजाब मध्ये महानगर पालिका निवडणुका पार पडल्या. भाजपा नेतृत्वाचा माज उतरविणारे निकाल जनतेने दिले आहेत. चड्डी तर सोडाच पण अंगावर साधी चींधीही शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी मतदारांनी घेतली. शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी, देशद्रोही म्हणणे.. रस्त्यावर खंदक खोदणे, काटेरी तारांचे कुंपण उभे करणे असले भयंकर प्रकार केंद्रातील मानसिक रुग्णांनी केलेत. त्यांचेच रखैल टीव्ही चॅनल तर वाटेल तसे बरळत होते. सुमारे २०० शेतकरी आंदोलनात शहीद झालेत. तरी या देशाचा पंतप्रधान एका शब्दाची खंत व्यक्त करत नाही, ही या माणसाच्या लायकीची पावती देणारी घटना आहे. आणि त्या पक्षातील कोणीही त्यावर काही बोलण्याची हिम्मत करत नाही. याचाच अर्थ असा, की ही विकृती आता शिगेला पोचली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत ‘समाधान सिर्फ एक फोन कॉल की दुरी पर है’ अशी नौटंकी बाज भाषा वापरून भक्तांना मूर्ख बनवता येते, जनतेला नाही. शेतकरी नेत्यांनी ‘नंबर बताईये, हम कॉल करते है’ म्हणून खुले आवाहन केले. पण हे झेंडू सरकार बोलायला तयार नाही. त्यांचे प्रवक्ते तर किळसवाणे आहेत. वरपासून खालपर्यंत अंतिम स्टेजचे मानसिक रुग्ण आहेत.

काँग्रेस मध्ये जेव्हा जेव्हा अतिरेक झाला, तेव्हा तेव्हा बंड देखील झाले. अर्थात सध्याच्या लोकांचे अत्याचार पाहता, इंग्रजांची औलाद देशात अजूनही जिवंत आहे, यावर शिक्कामोर्तब होते. वास्तविक या लोकांबद्दल प्रचंड असंतोष जनतेत आहे. पण विरोधकांना ब्लॅकमेल करणे, इडी लावणे, वाटेल तशा केसेस लावणे, आंदोलनात फूट पाडण्यासाठी कारस्थान करणे, आपलीच माणसं घुसवून आंदोलन बदनाम करणे, असले मूर्खपणाचे चाळे या लोकांनी अजूनही बंद केलेले नाहीत. काही अपवाद सोडले तर विरोधक देखील शेपट्या टाकून बसलेले आहेत, कारण यांच्या शेपट्या त्यांच्या दगडाखाली अडकलेल्या आहेत. आणि मग विरोधक आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी ‘ईव्हीम त्यांच्या हातात असल्यामुळे, भाजपा समोर कुणी टिकू शकत नाही’ असली निरर्थक भूमिका घेतांना दिसतात. त्यामुळे काठावर असलेला किंवा थोडाफार नाराज असलेला मतदारही नाईलाजानं भाजपाला मतदान करून मोकळा होतो. जर तेच जिंकणार असतील, तर मग उगाच त्यांच्याशी दुश्मनी घेण्यात तरी काय फायदा ? असा साधा सोपा विचार सामान्य माणूस करतो.

वास्तविक गोवा, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा इत्यादी राज्यात भाजपा अलीकडच्या निवडणुकीत हरलेली आहे. तोडफोड, ब्लॅकमेल करून त्यांनी सरकारं बनवली हा भाग वेगळा. पण खुद्द गुजरात आणि आता बिहार मध्ये त्यांची हालत पातळ झाली होती. तेजस्वी यादव सारख्या तरुण नेत्यानं यांच्या तोंडाला फेस आणला होता, हे वास्तव मात्र ईव्हीमच्या नावानं गळा काढणारे लोक, सोयीस्कर रीतीनं विसरतात.

अर्थात, लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात संशय राहू नये, अशी पारदर्शी निवडणूक प्रक्रिया असायलाच हवी. तो जनतेचा अधिकार आहे. आणि त्यासाठी मशीन ऐवजी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची जनतेची मागणी निवडणूक आयोगानं मान्य करायला हवी, अशी आमचीही भूमिका आहे. मात्र भाजपा वोटिंग मशीन मध्ये घोटाळे करून निवडून येते, या मताशी आम्ही सहमत नाही. अर्थात काही मोजक्या ठिकाणी छोट्या मोठ्या गडबडी होण्याची शक्यता असतेच. आणि बॅलेट पेपरवर मतदान झाले, तरी ते होणारच आहे.

मशीनच्या नावानं गळे काढणाऱ्या लोकांची तक्रार कशी निराधार आहे, यासाठी खालील उदाहरणं बोलकी आहेत.
✓ नुकतीच हैद्राबाद महानगर पालिकेची निवडणूक पार पडली. ती बॅलेट पेपरवर घेण्यात आली. त्यात भाजपचे संख्याबळ ४ वरून ४० च्या पुढे गेले.. याचा अर्थ काय होतो ?
✓ परवाच्या पंजाब मधील निवडणुकीतील किस्सा ह्यावर जास्त प्रभावी भाष्य करणारा आहे. ह्या निवडणुका मशीनवर घेण्यात आल्या. तरीही भाजपची पार माती माती झाली. भाजपाच्या एका पराभूत उमेदवाराने वोटिंग मशीनवर आक्षेप घेतला आहे. त्याची तक्रार अशी, की माझ्या स्वतःच्या घरी १५/२० मतदार आहेत. तरीही मला फक्त नऊ मतं कशी काय मिळाली ?

त्याच्या ह्या शंकेतच मतदारांच्या मानसिकतेचा खरा परिचय आहे. यावर मशीन विरोधकांनी काय युक्तीवाद करायचा तो खुशाल करावा, पण माझ्या मते ही प्रतिक्रिया भारतीय राजकारण आणि भविष्यातील वादळाची चाहूल देणारी आहे.

माझ्यामते या तक्रारीचा आणि मिळालेल्या वीस पैकी फक्त नऊ मतांचा अर्थ अगदी सरळ आहे की, आता भाजपची बदमाशी, नेतृत्वाचा नीचपणा बघून त्या उमेदवाराच्या कुटुंबातले लोक सुद्धा वैतागलेले आहेत. भाजपमध्ये असलेली कोणतीही बिमारी त्यांना आता घरामध्ये नको आहे. ते भीतीमुळे किंवा उगाच रिस्क नको म्हणून उघड काही बोलले नसतील, पण त्यांच्याही मनात भाजपाच्या माजलेपणाबद्दलचा राग काठोकाठ भरला आहे. आणि या निमित्तानं त्यांनी तो मतदानातून व्यक्त केला आहे. हीच मानसिकता संपूर्ण पंजाबमध्ये दिसली. म्हणून तर काही ठिकाणी भाजपाला खाते सुद्धा उघडता आलेले नाही. महाराष्ट्रातील विधान परिषदचे नुकतेच पार पडलेले निकाल देखील याच दिशेनं इशारा करतात, असं मला वाटते.

पर्याय काय, सक्षम विरोधी नेता कुठं आहे, असले प्रश्न विचारणारे जे लोक आहेत, त्यांनी हे समजून घ्यायला हवं. परिस्थितीतून नवे नेते आपोआप जन्माला येतात, उगाच रडगाणं गाण्याची गरज नाही.

तेव्हा, घाबरु नका. वोटिंग मशीनमुळे आपल्या हातात काही नाही, असली अविचारी बोंब मारत बसू नका. लोकांच्या मनात निराशा रुजविण्याला कळत नकळत हातभार लाऊ नका. त्यापेक्षा विकृतीचा विरोध करण्यासाठी समोर या. कुणाचाही माज जास्त दिवस चालत नाही. आणि हा माज शेतकरी आंदोलनाने बऱ्यापैकी उतरवला आहे. लौकरच हरियाणा सरकार पडेल, अशी शक्यता आहे. बिहार देखील धोक्यात आहे. बंगाल निवडणुकीत काय घडते, यावर पुढील घटनांची गती कमी, अधिक होईल. उत्तरप्रदेश मध्ये पंजाबची पुनरावृत्ती होऊ शकते, हे लक्षात घ्या.

पंजाबच्या स्वाभिमानी आणि डोळस मतदारांचे मनःपुर्वक आभार ! शेतकरी आंदोलनाला मनःपुर्वक शुभेच्छा ! आणि निदान आतातरी अंधभक्तांना सद्बुद्धी येवो, अशी अपेक्षा !

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *