तानाजी सावंतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंड करणार ?

 

धाराशिव : राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे करण्याची दाट शक्यता आहे. या बंडाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा छुपा पाठिंबा आहे किंवा नाही हे बंड केल्यानंतर लवकरच दिसून येईल.

आरोग्य मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी भेटली नसल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहेत. ते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये महाविकासआघाडी विरुद्ध महायुतीविरुद्ध वंचित बहुजन आघाडी असे चित्र पाहायला भेटण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सत्तांतर करण्यासाठी जवळपास दीडशे बैठका घेतल्या होत्या आणि त्यांनी सत्तांतर घडवून आणले, असं जाहीर सभेत त्यांनी वक्तव्य केलं होतं मात्र स्वतःच्या पुतण्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी देण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्यास यशस्वी ठरले आहेत.

अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून सावंत समर्थक प्रचंड नाराज झाले असून त्यांनी राजीनामा सत्र चालू ठेवले आहे. हजारो कार्यकर्ते धनंजय सावंत यांना भेटून पाठिंबा देत आहेत. तर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची गळ सुद्धा हे समर्थक घालत आहेत. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही प्रचार केला त्या राष्ट्रवादीचा आम्ही प्रचार करणार नाहीत. त्यांच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाहीत, असं समर्थक ठासून सांगत आहेत.

धनंजय सावंत हे उस्मानाबाद लोकसभेसाठी इच्छुक होते. धाराशिव जिल्ह्यातील चांदा ते बांदा असा प्रचार त्यांनी चालू ठेवला होता. प्रत्यक्ष वाडी वस्ती ते गाव खेड्यापर्यंत त्यांनी संपर्क अखंडपणे चालू ठेवला होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली काम, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेली काम या जोरावरच त्यांनी प्रचार जिल्ह्यात चालू ठेवला होता.

अटीतटीच्या लढाईमध्ये तानाजी सावंत हे आपले पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी देण्यास अपयशी ठरले आहेत. तर भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे त्यांची पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेदवारी मिळवून देण्यास यशस्वी ठरले आहेत.

कालपासून सावंत समर्थक नाराज असल्याचे चित्र सध्या तरी जिल्ह्यात दिसून येत असून सावंत समर्थक हा निर्णय बदला अशी आर्थ हाक देत आहेत. उद्या तानाजी सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची शक्यता असून जिल्ह्यामध्ये ऑल इज वेल नसल्याचे सध्यातरी चित्र दिसून येत आहे.

झालेला निर्णय बदला आणि धनंजय सावंत यांना उमेदवारी द्या, अशी मागणी सावंत समर्थकांकडून होत असून ती मान्य नाही झाल्यास आम्ही राजीनामा देऊन धनंजय सावंत यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे करू आणि त्यांना निवडून आणू किंवा बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू अशी कार्यकर्त्यांतून मागणी होत आहे.



सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर ५,९६,६४०, राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील ४,६९,०७४ तर वंचित आघाडीचे अर्जुन सलगर यांना ९८,५७९ मतदान पडले होते. धनंजय सावंत यांनी बंडखोरी केली तर वंचित आघाडीचे मतदान तसेच सावंत यांचे मतदान असे एकत्र होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *