अवाजवी दर आकारात असल्याने खाजगी रुग्णवाहिका देखील सरकारच्या ताब्यात..!

| मुंबई | “रुग्णवाहिकांबाबत मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारला तर त्याचे लायसन्स रद्द करुन त्याच्यावर गुन्हाही दाखल केला जाणार”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णासाठी आणि इतर आजारांच्या रुग्णांसाठीही रुग्णवाहिकेची लोकांना गरज लागत आहे. पण अशा परिस्थितीत रुग्णवाहिका चालवणारे मोठी किंमत लोकांकडून वसूल करत आहेत. ही लूट थांबवण्यासाठी सरकारने खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचे ठरवले आहे.

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा हा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेईल. त्यापेक्षा जर कुणी अधिक दर घेतला तर परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हाही दाखल केला जाईल. ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर लोकांनी जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करू शकता.”

“महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. कोरोनाच्या काळात ज्या समस्या समोर येतात त्यावर देखरेख ठेवतील. त्यात कोविड रुग्णालय म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश नाकारला जातो. मात्र यापुढे हा प्रवेश नाकारता येणार नाही. कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था करण्यासाठीही ही समिती लक्ष देईल. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी एक हेल्पलाईन असावी त्याची अंमलबजावणी ही समिती करेल”, असंही टोपे यांनी सांगितले.

“काही भागात अनावश्यक गर्दी वाढत आहे. त्यामुळे विनाकारण फिरू नये यासाठी दोन किलोमीटरचा निर्णय घ्यावा लागतोय. अनेकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाची नीट कल्पना नाही. त्यामुळे ते बाहेर पडतात आणि त्यांची वाहनं जप्त केली जात आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून हे पाऊल उचललं जात आहे. तरीही लोकांशी जास्त कठोर वागू नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *