गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा १० ऑगस्टपर्यंत करा, आढावा बैठकीदरम्यान कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश…

| मुंबई | स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा विशेष मोहीम राबवून दि. १० ऑगस्टपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. कृषी आयुक्त धीरजकुमार व राज्यातील कृषी सहसंचालक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

राज्यात शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. ह्या प्रलंबित प्रकरणांमधील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व विभागीय कृषि सहसंचालकांनी विहित कालावधीमध्ये कार्यक्रम आखावा व प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या.

योजनेंतर्गत प्रस्तावांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी मोबाईल ॲप तसेच पोर्टल तयार करण्याबाबत कृषिमंत्री भुसे यांनी निर्देश दिले. अर्ज ऑनलाईन आल्यास त्यावरील कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते.

ज्या व्यक्तींच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत होता आता मात्र या योजनेअंतर्गत सात बाऱ्यावर नाव असलेला शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी विमा कंपनी, ब्रोकरेज कंपनी व कृषि विभाग यांनी समन्वयातून कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले.

विमा कंपन्यानी अर्जदाराकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता विम्याचा दावा तात्काळ निकाली काढावा असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *