विरोधकांची सरकारे अस्थिर करायची हे तर केंद्राचे एकमेव सूत्र – सामनातून पायलट प्रकरणावर टीका

| मुंबई | राजस्थानातील भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात ‘देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे,’ अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर करण्यात आली आहे. तसेच “पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वत:ला कलंकित करुन घेऊ नये” असा सल्लाही राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना यातून दिला आहे.

नक्की काय म्हटले आहे ‘सामना’च्या अग्रलेखात?

“देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे, पण ते शक्य होईल असे दिसत नाही. मध्य प्रदेशात काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे हे 22 आमदारांसह भाजपात विलीन झाले. शिंदे यांना बक्षिसी म्हणून राज्यसभा मिळाली. उद्या ते केंद्रात मंत्रीही होतील. मध्य प्रदेशचा घास गिळला तेव्हाच सगळ्यांना खात्री होती की, पुढचा नंबर राजस्थानचा आहे. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याच मार्गाने जातील असे पैजा लावून सांगितले गेले. ते खरे ठरताना दिसत आहे.

सचिन पायलट यांनी राजस्थानात 30 आमदारांसह बंड केल्याची बोंब आहे, पण हा आकडा फुगवलेला आहे. 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँगेसचे 107 आणि भाजपचे 72 आमदार आहेत. अपक्ष व इतर आमदारही सरकारबरोबर होते. त्यातले काही परंपरेप्रमाणे कुंपणावर जाऊन बसले आहेत. पायलट यांचा दावा असा की, काँगेसचे सरकार आता अल्पमतात आले आहे. पायलट यांचे म्हणणे खरे असले तरी सरकारचे भविष्य हे विधानसभेत ठरेल. काँगेस आमदारांची जी बैठक विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलावली, त्यास पायलट यांना मानणाऱ्या दहा-बारा आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे खरा आकडा हा विधानसभेत डोकी मोजल्यावरच कळेल.

जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही. यासाठी भारतीय जनता पक्ष उघडपणे काहीच करीत नसून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चालले आहे. याक्षणी तरी भाजपच्या दृष्टीने पायलट यांचा पोरखेळ हा काँगेसचा अंतर्गत प्रश्न आहे व त्याच्याशी त्यांचा संबंध नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांना फूस लावून फोडले तेव्हाही भाजपच्या दृष्टीने हा काँगेसअंतर्गत प्रश्नच होता व आता पायलट यांची खेळी हादेखील अंतर्गत प्रश्नच आहे. महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपने सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे अशा अंतर्गत बाबी सोयीप्रमाणे ठरत असतात. मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपवर जो घोडेबाजाराचा आरोप केला तो गंभीर आहे. एका एका आमदाराला पंचवीस कोटींची ऑफर दिली जात आहे व तसे व्यवहार सुरू आहेत, पण आता आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत त्या गेहलोत यांना पाठिंबा देणाऱया आमदारांवर. हे गूढ व रहस्यमय आहे.

पायलट यांनी काँगेस सोडावी यासाठी मध्य प्रदेशमधून फुटलेले ज्योतिरादित्य शिंदे हे परिश्रम घेत आहेत. बाटगा जरा जास्तच जोरात बांग देतो, त्यातलाच हा प्रकार व यापासून कोणताही पक्ष दूर नाही. राजकारणात बाटग्यांना महत्त्व मिळते हा प्रकार नवा नाही. पायलट विरुद्ध गेहलोत यांचा झगडा हा त्यांचा अंतर्गत वाद असेल तर भाजपने सध्या तरी त्या झगडय़ात पडू नये, पण भाजप याक्षणी कुंपणावर आहे व त्यांनी फुटण्याचा ताजा अनुभव असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्रधार केले आहे. पायलट यांची महत्त्वाकांक्षा राजस्थानचे मुख्यमंत्री बनण्याची आहे. ते आता उपमुख्यमंत्री व राज्य काँगेसचे अध्यक्ष आहेत. ते तरुण आहेत व भविष्यात त्यांना संधी आहे, पण गेहलोत द्वेषाने पछाडल्यामुळे त्यांना भविष्यापेक्षा वर्तमानातच मोठा झगडा करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवायची आहे. हे त्यांचे पाऊल आत्मघातकी ठरेल.

मोदी व शहा यांनी प्रचंड यंत्रणा राबवून, झंझावात निर्माण करूनही राजस्थानात भाजपला सत्ता मिळाली नाही. लोकांचा कौल काँगेसच्या बाजूने होता. पायलट यांनी या विजयासाठी मोठी मेहनत घेतली हे मान्य, पण आज पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱया उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वतःला कलंकित करून घेऊ नये. आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी स्पेशल ऑपरेशन ग्रुपने सचिन पायलट यांना एक नोटीस पाठवली व पायलट यांच्या संयमाचा अंत झाला. हे सर्व गेहलोत यांनी घडवून आणले असा पायलट यांचा आरोप आहे, पण अशीच नोटीस खुद्द मुख्यमंत्री गेहलोत यांनाही पाठवली आहे. पायलट यांचा अहंकार आणि व्यक्तिद्वेष राजस्थानसारखे राज्य अस्थिर करीत आहे, पण केंद्रीय सत्तेची फूस पायलट यांना असल्याशिवाय ते शक्य नाही.

विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करीत आहे. देशापुढे कोरोनाने कोसळलेली अर्थव्यवस्था, लडाखमधील चिनी घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. लडाख सीमेवरील आपल्या 20 सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँगेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरू आहे. वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल. भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान आहे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *