उदयनराजे शपथविधी प्रकरण : संजय राऊत यांचा घणाघात..!

| मुंबई | “जय भवानी, जय शिवाजी” ही घोषणा नियमभंग करणारी, घटनाबाह्य नाही. तर ती जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, उद्या जय हिंद, वंदे मातरमवर आक्षेप घ्याल का? जय भवानी, जय शिवाजी ही महाराष्ट्राची घोषणा आहे. हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. शत्रूविरुद्ध लढताना चेतना जागविण्यासाठी सीमेवर भारतीय सैनिकही ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देतात, असं राऊत म्हणाले. यापूर्वी सभागृहात शपथ घेताना “अल्ला हो अकबर”च्याही घोषणा दिल्या गेल्या आहेत. व्यंकय्या नायडू नियमानुसार बरोबर वागले असतील. तरी जनभावनांचा अवमान झाला आहे, असं राऊत म्हणाले. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणा दिल्या आहेत. हा वाद वाढू नये, नायडू हे वरिष्ठ आहेत, असं देखील राऊत म्हणाले.

काय बोलले संजय राऊत

ते म्हणाले की, उदयनराजेंचा संवाद ऐकण्यात एक वेगळा आनंद आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कोणीही छत्रपतींच्या नावाने राजकारण करू नये. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नियमबाह्य आहे, घटनाबाह्य आहे असं कधीच वाटलं नाही, असंही ते म्हणाले.

तसे नायडूंचं वक्तव्य सभागृहाला अनुसरून..

खासदार राऊत म्हणाले की, व्यंकय्या नायडूंनी जे केलं के सभागृहाला अनुसरून केलं आहे. छत्रपतींबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या वैयक्तिक आहेत. छत्रपपतींच्या नावानं आम्ही उभे आहोत. आमची मनगटं बनली आहेत. सीमेवर जवान जेव्हा शत्रूंशी सामना करतात तेव्हा ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलतात याचा अर्थ यात किती ताकद आहे, हे सांगायला नको, असं ते म्हणाले.

उदयनराजेंना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार

ते म्हणाले की, खासदार उदयनराजे माझ्यावर टीका करतात. त्यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. ते टीका करू शकतात. ते म्हणाले मी महान आहे. माझं मत आहे की, छत्रपती महान आहेत, आम्ही त्याचे मावळे आहोत, असं राऊत म्हणाले.

भाजपचं तोंडबंद आंदोलन : संजय राऊतांचं ट्वीट

जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरुन झालेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपचं तोंडबंद आंदोलन सुरु झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते. “”छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही…जय भवानी! जय शिवाजी!,” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

नक्की काय आहे प्रकरण :

सभापतींची उदयराजेंना समज
राज्यसभा खासदारांनी काल (२२ जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. “तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ असं व्यंकय्या नायडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *