विद्यापीठांच्या कुलगुरूंनी देखील परीक्षा घेण्यास दाखवली असमर्थता..! मुख्यमंत्री बैठकीत परीक्षा न घेण्यावर शिक्कमोर्तब..!

| मुंबई | नुकताच बंगळुरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सद्य:स्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही, असे राज्य सरकारतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. सर्व १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही सद्य:स्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत संगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी हे जाहीर केले. परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही, तर राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आशा परिस्थितीत आता परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका आहे. असे सामंत यांनी स्पष्ट केले.

परीक्षा न घेण्याची ही कारणे :
१. अनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे क्वॉरंटाइन सेंटर म्हणून उपयोगात येत आहेत.
२. वाहतुकीची व्यवस्था नसल्याने गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात परत येणे अवघड आहे.
३. अनेक विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके, संगणक साहित्य त्यांच्या वसतिगृहात अडकले आहेत.
४. नुकतेच बंगळुरूमध्ये ५० जणांची परीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार?
५. तसेच पालक आणि शिक्षक यांचा देखील लगेच परीक्षा घेण्यास विरोध आहे. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा आता लगेच घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यूजीसी जर मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला देते तर जबाबदारीही घेणार काय, असा प्रश्नही सामंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

कोरोना ओसरल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचीही संधी :
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि परिस्थिती सुधारल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना परीक्षेची संधी देण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून विद्यापीठांना सूचना :
• मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील-वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा.
• मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्र परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी.
• कोरोनाची स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून इच्छुक विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्र परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील याविषयी संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्याशी विचारविनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे.
• दिल्ली, पंजाब, बंगालसह ज्या राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत त्या ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीसुद्धा राज्य सरकारच्या वतीने चर्चा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *