कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | ‘कंगना ला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’, असे मोठे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रानौत ने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर सर्वच स्तरातून कंगनावर टीका होत आहे. बॉलिवूडपासून मराठी कलाकार, राजकारणी आणि सर्वसामान्य नागरिकही कंगनावर टीकास्त्रसोडत आहेत. यातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कंगनाच्या विधानावर आपली प्रतिक्रीया माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रानौत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली. यानंतर मराठी कलाकारांसोबतच बॉलिवूड सेलेब्रिटींनीही तिच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राजकीय नेत्यांकडूनही तिच्यावर टीका केली जात आहेत. आता यावर कंगनाने भाष्य केले आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस हे सक्षम पोलिस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.”

दरम्यान, या वक्तव्यावरून #कंगना_रनौत_चल_निकल हा ट्रेंड सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. त्या सोबतच गेट वेल सून सारखे संदेश देखील व्हायरल होताना दिसून येत आहे. एकंदरीत कंगना तिच्या नावाची माती होईपर्यंत थांबणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल..

काय म्हणाली होती कंगना :

खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ‘ आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *