पालकांना न सांभाळणा-या कर्मचाऱ्यांचा ३०% पगार पालकांना, लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय..

| लातूर | मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30% वेतन मातापित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि.10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये माजी राष्ट्रपती डॉ .प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, प्रा. अरुणाताई कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लातूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास साडेबारा हजार कर्मचारी कार्यरत असून एकूण 14 विभाग आहेत. या सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे जर आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या एकूण पगाराच्या 30 % रक्कम ही संबंधितांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी असा ठराव आजच्या सर्वसाधारण सभेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला. मंचकराव पाटील यानी ठराव माण्डला तर रामचंद्र तिरुके यानी अनुमोदन दिले .आणि जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी तोमंज़ूर केला.
समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम,सामान्य प्रशासन आदींसह विविध विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी वृद्ध मातापित्यांच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.लातूर जिल्हा परिषदेचा हा निर्णय क्रांतीकारी असल्याचे मत सामाजिक क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.

या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष मा. राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, बांधकाम सभापती संगीताताई घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *