भाजप नेत्यांच्या भेटीनंतर देखील अण्णा जानेवारीतील उपोषणावर ठाम..!

| पारनेर | शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. दिल्लीतील रामलीला मैदान अथवा जंतरमंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली नाही तर आपण अटक करवून घेऊ व तुरुंगात उपोषण करू, असा इशारा हजारे यांनी दिला.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र पाठवून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन, ‘आपल्या मागण्या रास्त आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उपोषण करू नये, मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ द्यावा’, अशी विनंती केली. मात्र सरकारला आपण दोन वर्षे वेळ दिला. दोन वर्षांत शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे म्हणाले.

उपोषणासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोपर्यंत एक महिना केंद्र सरकार काय भूमिका घेते, याची आपण वाट पाहू. शेतकरी हिताचा काही निर्णय झाला तर ठीक, नाही तर जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात नवी दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *