काही मिनिटात रेल्वेची बक्कळ कमाई..!

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जवळपास महिन्याभराहून अधिक काळासाठी ठप्प असणारी भारतीय रेल्वे सेवा पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने सुरु होण्याच्या रुळावर आली आहे. खुद्द रेल्वेमंत्री आणि रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर प्रदीर्घ कालावधीनंतर रेल्वे सेवेअंतर्गत खास सुविधा पुरवण्यासाठी म्हणून अधिकृत संकेतस्थळार सोमवारी तिकीट विक्री सुरु करण्यात आली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच रेल्वेचं संकेतस्थळ ‘क्रॅश’ झालं होत.

कालांतराने पुन्हा नव्या माहितीसह सुरु झालेल्या या संकेतस्थळाच्या मदतीने हजारो प्रवाशांनी इच्छित स्थळी जाण्यासाठीची तिकीटं आरक्षित केली. काही तासांतच काही रेल्वे गाड्यांची आरक्षणं संपलीसुद्धा.

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेली आकडेवारी पाहता या तिकीट आरक्षणातून रेल्वेलाही चांगलाच आर्थिक फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.  रेल्वेशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार स्पेशल रेल्वे सुविधेअंतर्गत जवळपास ८२, ३१७ प्रवाशांनी आरक्षित तिकीटं देण्यात आली आहेत. या प्रक्रियेदरम्यान, ४५,५३३ पीएनआरही देण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब, म्हणजे भारतीय रेल्वेने अवघ्या काही तासांच्या या तिकीट आरक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान, कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. 

बऱ्याच काळापासून, रेल्वे सुरु करण्याची मागणी अनेक स्तरांतून करण्यात येत होती. अखेर रेल्वेकडून प्रवासासाठी अधिकृत संकेतस्थळावरुन तिकीट विक्रीला सुरुवात करण्यात आली, तेव्हा १६,१५,६३,८२१ रुपये इतकी घसघशीत कमाई रेल्वेच्या खात्यात जमा झाली आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून तिकीटांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली होती. ज्यानंतर ऑनलाईन बुकिंग सुरु होताच हावडा – दिल्ली या एक्स्प्रेस गाडीतील फर्स्ट एसी आणि थर्ड एसी क्लासमधील सर्व तिकीटं अवघ्या १० मिनिटांत विकली गेल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *