पालघरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी – अजित पवार


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल

मुंबई: करोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. घराबाहेर पडू नका. गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. यापुढचे काही दिवस टाळेबंदीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे, असं सांगतानाच करोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेला आहे. त्यांची ही भीती आणि इशारा आपल्याला खोटा ठरवायचा आहे, त्यासाठी सावध राहा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या एका प्रेसनोटमध्ये हे आवाहन केलं आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगाव सारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचे मनापासून, स्वयंशिस्तीने काटेकोर पालन करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. मुंबईत काल साडेचारशेहून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. २४ मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील ५३ पत्रकारांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातून करोनाने हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येते. तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. हे थांबले पाहिजे. घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे, घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, डॉक्टर आणि पोलिसांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचे, घरातच थांबण्याचे, गर्दी न करण्याचे, सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्ही देखील सामाजिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, बैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातच थांबून त्यांना साथ द्यावी, ही त्यांची अपेक्षा आहे. नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही करोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे करोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही करोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास करोनाच्या लढाईत विजय नक्की आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पालघरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी
यावेळी त्यांनी पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्येचा निषेध नोंदवला. करोनाविरुद्धच्या लढाईत जात-पात, भाषा-प्रांत, धर्म-पंथ विसरुन एकजूट होऊन साथ देण्याची गरज आहे. करोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे, असं आवाहन करतानाच पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले. पालघर प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली असून शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे. सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *