अंशदायी पेन्शन योजना आणि खाजगीकरणा विरोधातील लढा तिव्र करा. -अविनाश दौंड

| मुंबई | विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दीन-दुबळे, कामगार आणि महिलांना विविध कायदे करून अनेक महत्त्वाचे हक्क मिळवून दिले आहेत. परंतु सांप्रत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे या हक्कांचा मोठ्या प्रमाणावर संकोच होत आहे. सरकारी व सार्वजनिक उद्योगांचे झपाट्याने सर्रास खाजगीकरण करून भरती मधील आरक्षण संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव असल्याचे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.

याबरोबरच देशातील आणि राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारुन त्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे. यासाठी मोठ्या देशव्यापी लढ्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बौद्धजन महासंघ अणुशक्ती नगर, मुंबई यांनी आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मागील शतकात निकराचे लढे देऊन ४४ कामगार कायदे मिळवणाऱ्या लढाऊ कामगारांना आताच्या सरकारने कामगार विरोधी फक्त ४ संहिता लागू करुन समस्त कामगार वर्गावर मोठा अन्याय केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय घटनेचा हा स्पष्टपणे अवमान असल्याचे दौंड यांनी या प्रसंगी सांगितले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता वर्णन करुन आजच्या घडीला आपण त्यांच्या ज्ञानपिपासेचा अवलंब केला पाहिजे आणि अन्याया विरोधात जोरदार संघर्ष केला पाहिजे असेही दौंड यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्ध महासंघ अणुशक्ती नगर अध्यक्ष विजय काकडे यांनी तर आभारप्रदर्शन महासंघाचे सरचिटणीस नितीन जाधव यांनी केले दुरचित्रसंवादा द्वारे झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने राज्यातील अनेक जिल्ह्यातील लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *