सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिक्षकावर आली उपोषणाची वेळ. !

| पुणे | निवडणूक असो की जनगणना गावाचे सर्वेक्षण असो की कोरोणा काळात जीव धोक्यात घालून करावयाचे तपासणी नाक्यावरील काम. प्रत्येक वेळी शासनाला आठवतो तो म्हणजे शिक्षक कारण शिक्षकाने केलेले काम हे अचूक असते व शिक्षक कोणतीही टाळाटाळ न करता प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पूर्ण करतो असे असतानाही गेल्या सात महिन्यांपासून एका छोट्याशा गोष्टीसाठी शिक्षकांनी केलेली विनंती सात महिने उलटूनही पुर्ण होत नसावी आश्चर्यकारकच वाटते ना हे!

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश काढला यामध्ये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्या बँकेत घ्यायचे हा कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक अधिकार आहे असे असताना आणि जि. प. प्राथ. शाळा सूस ता. मुळशी जि. पुणे च्या काही शिक्षकांनी राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये पगार होण्यासाठी खाते बदलासंदर्भात विनंती केली असताना अजूनही त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवली जात आहे. शिक्षकांनी विनंती अर्जासोबत नवीन बँकेचे पासबुक, शिक्षकांचे वैयक्तिक अर्ज, मुख्याध्यापकांचे कव्हरिंग लेटर व शासनाचा स्वयंस्पष्ट असा आदेश जोडला असूनही प्रशासनाने बघु करू अशी आश्वासने देत सात महिने ढकलले आहेत.

काही राष्ट्रीयकृत बँका कर्मचाऱ्यांचे वेतन खाते काढल्यानंतर त्यांना मोफत 40 लाखांपर्यंतचा समूह अपघाती विमा, मोफत धनादेश पुस्तिका, निशुल्क एटीएम कार्ड व अन्य काही सवलती देत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षकांच्या अपघाती मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. जसे-मुळशी तालुक्यामध्ये श्री गणेश मोरे या तरुण शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर वेल्हे तालुक्यातील केंद्रप्रमुख श्री साखरे यांचाही नसरापूर-पुणे रस्त्यावर दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता अशा घटना डोळ्यांसमोर घडत असताना आपल्या नंतर कुटुंबाचे काय ही चिंता प्रत्येकच कुटुंब प्रमुखाला सतावत असते. अपघाती मृत्यूने बळी पडणाऱ्या शिक्षकांपैकी बरेचसे शिक्षक हे 31 ऑक्टोबर 2005 नंतर रुजू झालेले असल्याने त्यांना पेन्शन योजना लागू नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. परिणामी शिक्षक स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने SGSP म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज योजनेचा लाभ घेण्यासाठी विनंती करत असतील तर त्यांचे काय चुकले? आपले कर्तव्य इमानेइतबारे करणाऱ्या शिक्षकांना एक खाते क्रमांक बदलून मिळण्याचा अधिकार मिळत नसेल तर याहून मोठे दुर्दैव ते कोणते?

पुणे जिल्ह्यातील हवेली व पुरंदर तालुक्यामध्ये काही शिक्षकांच्या विनंतीनुसार त्यांचे गेल्या 3-4 महिन्यांपासून पगार राष्ट्रीयीकृत बँकेत झालेले आहेत. मग मुळशी तालुक्यात पगाराची खाते बदलण्यात कोणती अडचण आहे हेच कळत नाही? गेली सात महिने विनंती अर्ज पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेरीस जि. प. प्राथ. शाळा सुस येथील शिक्षक श्री. संजय बोरसे यांनी दि. 27 एप्रिल 2021 रोजी मुळशी पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.

शिक्षकांकडून अशी मागणी करण्यात येत आहे ज्या शिक्षकांची इच्छा असेल त्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करण्यात यावेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही ज्यांना अजूनही आपल्या जुन्याच बँकेत पगार ठेवायचे आहेत त्यांना ती मुभा कायम ठेवण्यात यावी.

” माझ्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी SGSP योजनेचा लाभ घेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे पगाराबाबत स्पष्ट आदेश असताना आणि आजूबाजूला शिक्षकांच्या अपघाती मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडत असताना गेली सात महिने म्हणजे सप्टेंबर 2020 पासून पाठपुरावा करूनही प्रशासन आवश्यक सहकार्य करत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मी 27 एप्रिल 2021 रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे.”
– श्री संजय अरुणराव बोरसे
पदवीधर शिक्षक जि. प. प्राथ. शाळा सुस ता. मुळशी जि. पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *