१५ जूनपासून शाळा सुरू होण्याची शक्यता.. हे आहेत पर्याय..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

 महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणा-या शाळांना ती मुभा नसेल असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसंच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचंही त्या म्हणाल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु आहे.

काय आहेत पर्याय
पर्याय १ : विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचे.

पर्याय २ : प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचे हा दुसरा पर्याय आहे

या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करत आहे. तसेच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *