परप्रांतियांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात – अजित पवार
रेल्वे मंत्र्यांकडे केली पत्रातून मागणी..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.

| मुंबई | राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई व पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात व त्यासाठीचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

अजित पवार म्हणाले कि, केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबिरव्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत.

पहिल्या देशव्यापी लॉकडाऊन समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे. रेल्वे मंत्रालयाने सदर वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्रसरकारतर्फे लागू लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी किंवा केंद्राने ठरविल्याप्रमाणे मुदत संपल्यानंतर ज्यावेळी रेल्वेसेवा सुरु होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास या मजूरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल, असेही अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *